मी म्हटलं, भावाच्या घरी आलेय. वर जाताजाता नेमकं तेच वहिनीला ऐकायला गेले... अरचू, भावाचे घर नाही, माहेरी आले म्हणा, शब्द महत्त्वाचे असतात... माहेरचा किस्सा मैत्रिणीला सांगत होती, ती म्हणाली, "कुछ भी बोल यार, भाई तो अच्छे हैं तेरे लेकिन दोनों भाभी भी अच्छी मिली.. तू बहुत लकी है ! बहुत नेक काम किए होंगे..... मी जास्त काही बोलणार इतक्यात परत तीच म्हणाली, "तो हमने कौन से बुरे काम किए हैं..." अग, तुझे माहेर जवळ आहे एका गावात म्हणून असं म्हणत आम्ही विषय थांबविला.
मी भाग्य वैगेरे मानत नाही. तिचा फोन ठेवल्यावर अनेक चेहरे आठवले, खूप चांगली माणसं तरीही कठीण प्रसंगी एकटीच असलेली. आपली मायेची माणसं असावी असे बहुतेक सर्वांना वाटत असेल, अगदी जवळ नसली तरी चालेल पण असावी. आटपाट नगराची गोष्ट आठवली? श्रीमंत भाऊ आणि गरीब बहिणीची. माझ्या बालपणी पुस्तके विकत घेण्याइतपत श्रीमंती नव्हती. आई वडिलांच्या कृपेने हुशारी जन्मजात मिळाली, मग काय? जे मास्तर शाळेत शिकवत ते सहज पाठ व्हायचं. बालवाडीत तर साऱ्या गावातील पोरं जमली तरी जो पर्यंत मी दिसत नव्हती बाईला शाळा भरल्यासारखे वाटत नव्हतं म्हणे. तेव्हापासून सवय, कोणीही म्हटलं ते गाणं / कविता म्हणून दाखव, आपलं सादरीकरण सुरू व्हायचं. आटपाट नगरच्या कथेने तर लय प्रसिद्ध केले होते. पैसे पण द्यायच्या आयाबाया. माझ्या आईसारखे अनेकांना ती आपलीच कथा वाटायची. त्यांच्या भावना कदाचित तेव्हा मला समजत नव्हत्या. माझ्यासाठी पाठीवर मिळणारी शाबासकी अन दहा वीस पैसे खूप जास्त होते. नंतर जेव्हा तर्क करू लागले तेव्हा ती कथाच कशी चुकीच्या पद्धतीने लिहिली हे समजलं. आजूबाजूच्या स्त्रियांना ती आपली कथा वाटायची कारण बहुतेक सर्वांना शिक्षण नाही वा नुसती अक्षरओळख, कमी वयात लग्न पण त्यांच्या भावाला मात्र घरच्यांनी शिकवले... शिक्षणाने खूप काही बदलतं.
मैत्रिणीसोबत माहेरच्या गप्पा मारल्या आणि मुली कितीही शिकल्या वा त्यांच्या घरी सुखात असल्या तरी, किती महत्त्वाचे असते माहेर नावाच घर याची जाणीव झाली. खरं तर घर तेच आहे पण रंगरंगोटी आणि सजावट यामुळे जवळपास वर्षभरानंतर वहिनी परत घरी रहायला आल्या. सगळं त्यांच्या आवडीने झाले असल्याने त्या जरा जास्तच खुश असणार यात शंका नाही. पण त्यांनी एकही फोटो मला काय पण सोशल मीडिया वर पण शेअर केला नाही. मी वारंवार व्हिडीओ कॉल वर घर पाहण्यासाठी प्रयत्न केला पण व्यर्थच. भाच्याला पण मला घराचे व्हिडीओ वा फोटो पाठवायला मनाई केली गेली. शेवटी मग नवीन वर्षाचे स्वागत सर्वांसोबत करायचे ठरवले. तिथे गेल्यावर समजलं की भावाने वहिनीला मला फोटो दाखवायला नाही म्हटलं होतं. मी घरी येवून स्वतः घर पहावं म्हणून सगळं... वहिनी तशी समजदार आहेच पण हे जरा जास्तच झालं, मला वाईट वाटलं की एवढं सजवलं पण माझ्यामुळे त्यांना डीपी पण नाही बदलता आला. मुलींना आपल्या घरी खरंच महत्व असावं म्हणजे मायबाप नसल्यावर सुद्धा माहेरघर उरतं.
माझ्या बालपणी पुन्हा शाळा सुरू झाली की सगळ्या मैत्रिणी आत्या, मामा, मावशी, काका वा इतर कोणाकडे जाऊन काय मज्जा केली यावर बोलायच्या. मी मात्र कायम अश्या अनुभवापासून दूर. आईला एकच भाऊ अन बाबाला पण एकच भाऊ, मग वाटायचं आत्या / मावशी पाहिजे होती? गरिबांची लेकरं जरा लवकर समजदार होतात म्हणे, हळूहळू मला माझ्यापेक्षा आईचे वाईट वाटायचं. तिची कथा आटपाट नगराची. तिलाही वाटत असावं आपण जावे माहेराला?? तिला माहेरचं सुख नाही तर आम्हाला तरी काय ? पण ती अनेकांना मायेने योग्य मार्गदर्शन करायची, त्यामुळे सतत कुणीतरी घरी यायचे. एकदा असंच मला कोनी नातेवाईक नाही म्हणून मी रडली तर आपलंच घर बरं असते असे समजावत शेवटी म्हणाली की मला माय बहीण असती तर पाठवले असतं त्यांच्याकडं.
असो, सासर वा माहेर याहीपेक्षा प्रत्येकाला विशेषतः त्या घरातील स्त्रीला ते घर "माझं" वाटणं महत्वाचे. नाहीतर काही दुखणे आले की जा आराम करायला माहेरी, असे नकोच. जिथं कुठे असो पण स्त्रीला सुख दुःख सगळं व्यक्त करता आले पाहिजे. तसं पाहिलं तर मुलं लहान असेपर्यंत असे माहेरी वा इतर ठिकाणी जाता येते पण एकदा का जबाबदाऱ्या वाढल्या की मग माहेरपण नुसतं दोन दिवसांचे पाहुनपण होऊन जाते. खरं तर आपल्या परंपरेने मुलगी माहेरी येणे म्हणजे खर्चिक बाब करून ठेवली आहे, म्हणजे तिला घ्यायला जाणे, साडीचोळी इत्यादी स्वागत. तिच्या जन्मापासून ती परक्याचे धन, लोकाच्या घरी जाणारं हे सगळेच तिला जन्मापासून परकं करून ठेवत असावं? एकदा का ती परकी ठरली तर मग तीचे हक्क अधिकार पण सहजपणे नाकारले जातात. अश्या अनेक बहिणी आहेत ज्यांनी वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा घेतला म्हणून ती कायमची परकी झाली. संपत्ती वडिलोपार्जित वा स्वतः ची मिळकत, घर म्हणून ते सर्वांना आपलं वाटावं भलेही भाड्याच्या खोलीत राहत असलो तरी घर म्हणून मायेची ऊब सर्वांना मिळावी.