सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

चहासोबत लेक्चर

"एक विचारू काय बाई, तुम्हाला राग तर नाही येन न" तिने संकोचल्यासारखे आईला विचारले.
"विचारा, राग कश्याला येणार" आई म्हणाली.
मग तिला थोडा धीर मिळाला आणि ती बोलली "तुम्ही आधी खूप गरीब होत्या म्हणे? खंर आहे ना"?
"हो"
"…… तो सांगत होता आम्हाले, तुम्ही आता श्रीमंत कसे झाले म्हणून" ती मोठ्या उत्सुकतेने म्हणाली.
"कसे ?" आईने विचारले
"तुम्ही म्हणे …… या बुवाचा नवस केला अन तो पावला तुम्हाले, म्हणून त तुम्ही झोपडीतून या बंगल्यात रहायाले आले. लय पैसे भेटले म्हणे " आपल्याला काहीतरी मंत्र मिळेल या हेतूने ती अधिकच स्पष्ट बोलू लागली होती.
"काय ?"
"आमच्या तिकडे सगळे जन तेच म्हणतात" ती म्हणाली
"ये घरात " भिंतीवरचे फोटो दाखवत आई म्हणाली "हे कोणाचे फोटो आहे?"
बाबासाहेब, जोतीराव फुले, सावित्रीबाई, रमाई, बुद्ध ….
"सगळ घर फिरली तरी हेच अन पुस्तक, कोणताच बुवाचा फोटो नाही आमच्या घरात, बुवावर विश्वास ठेवला असता तर,माझी पोर बुवा झाली असती ऑफिसर नाही, मुलं शिकली नसती अन परिस्थिती पण बदलली नसती."
"मग तो कावून असा म्हणते? अन लय लोक म्हनतात" तिची शंका तिने विचारलीच
"आम्ही गरीब होतो, पण पोरांना शिकवले तर ते चांगले जीवन जगतील, म्हणून आम्ही सगळ्या पोरांना शिकविले. माझ्या पोरांना पायात चप्पल पण भेटत नव्हती पण आता माझा नातू आमच्या कार मध्ये शाळेत जातो, दिसते ना, कोणाचं एकू नको, कोणी पावत नाही, लेकराले शिकव मंग तू पण श्रीमंत होशील. फक्त बाबासाहेबाचे ऐक कल्याण होईल.........." चहासोबत मोठे लेक्चर पण ऐकावे लागले त्या बाईला.....
(घरी गेल्यावर ऐकलेला एक मजेदार किस्सा)

विकृत संस्कृती

किती कमजोर आहे हा पुरुष
एखाद्या महिलेचा (ती कोणत्याही वयाची असो) पती निधन पावल्यानंतर तिचे आप्त स्वकीय तिचे सांत्वन करीत असताना एक गोष्ट आवर्जून सांगतात "सांभाळून घे ग बाई, मुलांना तुझ्याशिवाय कोण आहे आता. तूच आता आई अन बाप सुद्धा हो." आणि मग ती सगळ्या दुखावर मात करीत आई आणि बाप या दोन्हीही भूमिका खंभीरपणे पार पाडते. (याला बोटावर मोजण्यासारखे अपवाद असू शकतात)
मात्र हेच चित्र उलट झाले तर ….
तिचे निधन झाल्यास सगळे त्या पुरुषाबद्दल चर्चा करतांना "बिचारा पुरुष एकटा कसा राहील? घरात बाई तर पाहिजेच, मुलांना आई पाहिजेच, तो काय काय करेल? ......." या अश्या अनेक गोष्टी सुरु होतात आणि मग अमक्याची मुलगी आहे, तमक्याची बहिण आहे अशी चर्चा सुद्धा लगेच सुरु होते……
असे पहिले कि वाटते किती कमजोर, दुबळा आहे हा पुरुष …….
आज आपल्या देशात ६ करोडपेक्षा जास्त विधवेच आयुष्य जगणाऱ्या महिला भारतीय समाजाच्या विकृत मानसिकतेच दर्शन घडविते. स्त्रीला सतत दुर्बल बनवणाऱ्या या परंपरा जिवंत असतांना काय "ती" सक्षम होईल ?

असे का ?

सामाजिक परिवर्तन होत असलेल्या भारतीय समाजात दोन वर्ग दिसून येतात. एक परंपरेच्या नावाखाली चाललेल्या शोषणाला संस्कृती आहे, जतन केले पाहिजे म्हणून धडपडतो तर दुसरा वर्ग जो या शोषणाला कायम बळी पडत आला असून आता जागृत होऊन या बाबीला विरोध करतो .
आजकाल शिकलेले विशेषता लोककलेमध्ये उच्च शिक्षण घेतलेले हि कला नष्ट होत आहे म्हणून फार चिंतीत दिसतात. लोककला म्हणजे काय तर जागरण, गोंधळ, जोगवा मागणे इत्यादी. हे असे असेल तर वाघ्या- मुरली, जोगतिनी, देवदासी पण जिवंत ठेवाव्या लागतील.
ज्यांना वाटते संस्कृती टिकून राहावी त्यांनी ती टिकावी म्हणून आपला बळी द्यावा, इतरांना त्यांचे कर्तव्य शिकवू नये.
काय सामाजिक परिवर्तन झालेल्या घरातील आई- वडील आपल्या पाल्याला या लोककलेचा भाग होऊ देतील?