शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०११

बौद्धांच्या ब्राह्मणीकरणाला जबाबदार कोण?

१४ ऑक्टोबर १९५६ अशोकाविजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांना विषमतेवर आधारित ब्राह्मणीधर्मातून बाहेर काढून समानतेवर आधारित बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्यांनी धम्मदिक्षेसोबत २२ प्रतिज्ञा दिल्या. तेव्हाच्या शोषित, पिडित अस्पृश्य बांधवांनी या बदलाचा स्विकार सुद्धा केला. २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासाठी आपल्या घरातील दगड-धोंड्याचे देव फेकून दिले, स्वतः अशिक्षित असले तरि या पिडित समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तत्त्व “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” आत्मसात केले. आपल्या मुलांना शिक्षण दिले, त्यासाठी वाट्टेल ते कष्ट सहन केले, मोलमजुरी केली पण मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. तसेच अन्न, वस्त्र निवारा या मुलभुत अधिकारासोबत शिक्षणाचा सुद्धा अधिकार दिला. शिक्षणामध्ये फि माफी, शिष्यवृत्ती मिळाली. शिक्षण मिळाले, नोकर्‍या सुद्धा मिळाल्या, काहींनी व्यवसाय केले, अशा विविध मार्गाने या शिक्षित लोकांकडे आर्थिक सुबत्ता आली. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेने ज्यांना समाजात चपलेचे स्थान दिले होते, त्यांना या धर्मांतरामुळे सन्मानाचा जिवनमार्ग मिळाला.

मानसिक दडपणातून घडणार्‍या आत्महत्या की सामाजिक हत्या?


दैनंदिन वर्तमानपत्र वाचत असतांना एखादी तरी आत्महत्येची बातमी आपण वाचत असतो. कधी फक्त त्यावर नुसतीच नजर टाकतो, तर कधी वाचतो. वाचल्यावर आपण त्याबद्दल हळहळ व्यक्त करायला विसरत नाही. काही वेळा ही आत्महत्या सामुहिक स्वरुपाची असते, अश्या वेळी बरिच चर्चा वेगवेगळ्या गटात होत असते. “एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य स्वत:च्या हाताने संपविणे म्हणजे आत्महत्या”, अशी आत्महत्येची सर्वसाधारण व्याख्या मानली जाते. बहुतांश आत्महत्या या मानसिक दडपणातून वा तणावामुळे घडतात, असे वर्तमानपत्रातील बातम्यांवरून दिसून येते. कधी या आत्महत्येची कारणे काय? याची उत्तरे देऊन जातात, तर कधी अनेक अनुत्तरित प्रश्ने देऊन जातात.