===
जवळपास 25-30 वर्षांपूर्वी मोबाइल नव्हते, कॉम्पुटर नव्हते. टीव्ही व टेलिफोन फारच कमी लोकांकडे होते. बऱ्यापैकी घरात रेडियो असायचे. तेव्हा आईवडील आपल्या मुलांसोबत असे वागत होते? मोबाइल, टीव्ही नसल्यामुळे लहान मुले मोठ्यांच्या आजूबाजूला, किंवा अंगणात मुलांच्या घोळक्यात खेळत. घरातील मंडळी कामात असली तरी मुले त्यांच्या आजुबाजुला खेळतांना, मोठी माणसे काय व कशी करतात? याकडे लक्ष ठेवून असत. (आजही तसेच करतात).
मला आठवतेय, तेव्हा मोठी माणसे पण मुलांसोबत गप्पागोष्टी करत, आपण काय करतोय याबद्दल माहिती देत. त्यामुळे नवे नवे शब्द माहित होत. ती माहिती त्यांनी सांगितलेल्या शब्दांत साठत राही. शाळेत खेळ, गाणी याच्या सोबत 'घरी माहिती झालेले शब्द' 'लिहिता येतात' याचा आनंद व्हायचा. शाळेतले खेळ, गाणी, अक्षर ओळख, शब्द ओळख सगळेच खूप आवडायचे! मग काय, शिक्षण आवडीचे.
पण आता सगळीकडे शिक्षणाचे नवनवीन प्रकार आलेत! स्पर्धेचे युग आहे म्हणतात! त्याकाळातही स्पर्धा होती पण आजची जरा वेगळीच! म्हणून आजचे पालक म्हणतात मुले म्हणजे जवाबदारी आणि आपण त्याअर्थाने जबाबदार पालक. माझ्या मुलांना जर काही आले नाही तर आम्ही जबाबदार पालक नाही हे सिद्ध होणार! ही भीती सतत असते. मुलांचे संगोपन, पालनपोषण म्हणजेच शाळा असे जाणून आता आपण सगळेच पैसे मोजून प्री-स्कूल, ट्यूशन लावून आपली जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे होतो.
पण लहान वयातच एवढे क्लास? एवढ्या शिकवण्या? ज्यांना अनुभव आहे ते सांगतात कि मुले तीन-साडेतीन वर्षांची होतात तेव्हा ती खट्याळ-खोडकर असतात, त्यांना जे नको असतं त्याला नाही बोलतात. जे हवं त्यासाठी रडारड किंवा ओरडून जे हवय ते द्यायला (हट्ट पूर्ण करायला) लावतात. हाच खट्याळपणा हळू हळू घरच्यांना मुजोर वागणे वाटायला लागते. परिणामी मुलांच्या अशा वागण्याला निर्बंध लावण्यासाठी किंवा वळण लावायचा प्रयत्न म्हणून त्यांना 'कुठेतरी गुंतवून ठेवले पाहिजे' असे पालक ठरवितात.
हे वळण आपण लहानपणापासूनच लावत आलेलो असतो. अगदी तान्हा बाळाला देखील वळण लावावे लागते. जगण्याचे काही नियम माहित व्हावेत म्हणून आपण प्रयत्न करीत असतो. पण सहजपणे असा विचार काय प्रत्येकाच्या मनात येत असावा काय?
आपण बघतो कि जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा घरातली वडीलधारी मंडळी त्या बाळा साठी पूर्ण वेळ तयार असतात. त्याच्या सगळ्या गोष्टी बघतात. तहान भूक, अंघोळ-पांघोळ, हसणं-बघणं, ऐकणं-बोलणं, पकडणं-रांगणं-चालणं-धावणं-पडणं सगळ्याकडे लक्ष दिल जातं.
याचबरोबर घरात काही जण असेही असतात कि जे त्यांना वाटेल तेव्हा लहर म्हणून बाळाला झोपेतून उठवून त्याच्याशी गप्पा मारतात, म्हणजे आपल्याला हवे तेव्हा बाळाशी खेळतात. बाळही त्याला प्रतिसाद देते. कधी रडते तर कधी हसते.
पण जस जसे बाळ मोठे होत जाते, चालायला लागते, एक-एक गोष्ट शिकायला लागत असते, तेव्हा त्याच्या विकासाच्या किती गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असते? किती गोष्टींबद्दल आपण विचार करतो?
मुलांना त्यांच्या क्रियांना आपण कशा प्रतिक्रिया देतो? मुलं जेव्हा नवनवीन गोष्टी बघून त्याबद्दल विचारतात तेव्हा? किंवा स्वयंपाक घरातील भांडी दुसऱ्या खोलीत किंवा बाहेर घेऊन खेळ मांडतात तेव्हा? घराच्या भिंती किंवा जमिनीवर वस्तूने ओरखडे ओढतात तेव्हा? आपण करत असलेल्या गोष्टींचे अनुकरण करतात तेव्हा? आपण त्यांच्याशी कसे वागत असतो, याचा विचार आपण करतो का?
आता सर्वच मुलांच्या हातात मोबाईल खेळणे म्हणून येत आहे. मुलांना एंगेज ठेवायचे म्हणून मोबाईल हाती देणे किंवा टीव्ही लावून देणे सोपे झाले आहे. पण यातून मुलांना काय मिळणार आहे? यामध्ये खेळ आहे कि शिक्षण आहे? हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे का?
एवढा सगळं विचार केल्यावर शिक्षण व खेळ यात काय साम्य आहे? यावर विचार होणे आवश्यक आहे असे वाटते. शिक्षणावरून लक्षात येत आहे कि मुलांचे लालन-पालन, भरणं -पोषण, पालन-पोषण, संगोपन यावर खरेच पालकांसाठी देखील शिकवणी ची आवश्यकता आहे असे वाटत आहे.
आपल्या मुलाना मोठे होताना पाहण्यासारखं सुख नाही. सहभागी करुन घेत ते अजुन सोपे आहे. यातुन मुले सहज शिकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा