सोमवार, २१ जून, २०२१

बालसन्गोपनाचे किस्से

===

लवकरच गाथा चार वर्षांची होईल. जवळपास गेले वर्षभर आठवडा-दोन-आठवड्यात का होईना पण किमान एक तरी व्यक्ती अशी असतेच जी तिच्या शाळेबद्दल चौकशी करते. अजून शाळेत नाव नाही घातले (टाकले) म्हटल्यावर निदान ऑनलाइन क्लासला तरी बसवायला पाहिजे असा सल्ला आवर्जून असतो. सर्वच पालकांना आपल्या पाल्यांच्या बाबतीत काळजी आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते. त्यापोटी नेहमी आम्हाला गाथाबद्दल सूचना व मार्गदर्शन मिळत असते. गाथा ची शाळा हा आमच्या घरातला सध्या चर्चेचा विषय! आत्ता कुठे चार वर्षांची होत आहे ती! 

खरं तर एवढ्या लहान मुलांना शाळेत? ते ही पुस्तके, वह्या, शाळेचा घरचा अभ्यास, प्रसंगी बाहेरची शिकवणी? हा सगळा विचार केला कि डोकं जड होतं. सकाळी-सकाळी तीन-चार वर्षांची (आता तर अडीच वर्षांची देखील) मुले आपल्या आईवडिलां सोबत किंवा शाळेच्या बस/ व्हॅन ने शाळेला जाताना दिसली की वाटते - इतक्या लहान मुलांना कशाला हवी शाळा?
 
आधीच चौकटीतले जिवन जगणारे आपण! त्यातही आता स्पर्धेच्या युगात आहोत म्हणून मुलांचे बालपण खेळण्यासाठी असते हे त्यांना उमगण्याच्या आतच त्यांच्याकरीता देखील चौकटी आखून त्यांना वेळापत्रकात बसवून मोकळे होतो. मुलांची चौकट म्हणजे शाळा, शाळेतील अभ्यास, घरचा अभ्यास, बाहेरची शिकवणी हे ठरलेले आहे. आमच्या शेजारी ताई लहान मुलांची शिकवणी घ्यायच्या. त्यांच्या शिकवणीत सगळी मुले तीन ते सहा वर्ष गटातील. 

या शिकवणीत देखील आता वेगवेगळे प्रकार आहेत. आई वडिलांना आवडतं, त्यांची इच्छा आहे  म्हणून नाच गाणे किंवा इतर कोणतातरी क्लास (शिकवणी). अशा क्लासला जाणाऱ्या मुलांना विचारले तर सांगतील कि आई किंवा वडिलांनी या क्लासला टाकले. मुलांचे पालक म्हणतांना दिसतात कि "आम्ही नाही करु शकलो आवड असून देखील, म्हणून आमचे स्वप्न मुलं पूर्ण करतील." आपली स्वप्ने आपण लादतोय असे हे पालकांना लक्षातही येत नसेल काय?

शिकवणी च्या आधी विषय सुरु झाला होता शाळेचा. प्रश्न आहे की मुलांना कोणत्या वयात शाळेत पाठवायचे? कधी शिकवणी सुरु करायची? मी प्राथमिक धडे गावातल्या शाळेत घेतले. तिथे बालवाडी होती. केजीबीजी शहरात होती. त्यामुळे याच्याशी आमचा संबंधच नव्हता. बालवाडीत मस्त खेळ, गाणी, गमती-जमती आणि हसणे-खेळणे. अक्षर ओळख कशी झाली ते कळलंच नाही. सहा वर्षांचे असताना पहिली. स्पर्धा वैगेरे फारशी माहितीच नव्हती. थोडक्यात काय दडपण दबाव नव्हता.

आपण आजुबाजुला पाहिले तर अनेक अधिकारी पदावर वा विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती आवर्जून उल्लेख करतात कि, ते किती खडतर परिस्थितीतून पुढे आले. गावात, सरकारी शाळेतील वा छोट्या शाळेत शिकलोय. पण हेच जे स्वतः छोट्या शाळेत शिकले अन मोठ्या हुद्द्यावर पोहोचले, त्यांना आता वाटतेय की इंटरनॅशनल, मोठ्या स्कुल मधील शिक्षण चांगले! हा विरोधाभास का? 

लहान मुले काय केले तर जीवनात पुढे जाऊ शकतात यशस्वी होऊ शकतात यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन बालपणा पासून समजून घ्यावे लागेल. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या बालपणी फार खट्याळ होते, खूप खेळायचे, खोड्या करायचे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः सांगितले कि पदवीधर होईपर्यंत त्यांच्या हातून काही महत्त्वाचे काम होईल असे त्याना वाटत नव्हते. तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आज जगातील काहीच परंतु अत्यंत विद्वान, नैतिक व क्रांतिकारी महान व्यक्तींपैकी एक म्हणून जगाच्या इतिहासात अजरामर, अनुसरणीय व अत्यंत सन्माननीय आहेत. 

असे कसे घडले? बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र वाचले तर पटते कि निश्चितच योग्य वयात योग्य माहिती व शिकवण मिळाली तर नक्कीच व्यक्तीचे आयुष्य महान बनू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा